माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकटे पडलेयत का असा आरोप काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास सध्या इतर पक्षांमधून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांची रेलचेल असते. मूळ भाजपातील नेते मात्र त्यांच्या आसपास अभावानेच दिसतात अशी भजपामध्येही चर्चा आहे.
पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मिळत नाहीय. एकनाथ खडसे पक्षाच्या निर्णयप्रक्रीयेतून बाहेर फेकले गेले आहेत. जळगावचे दुसरे संकटमोचक नेते गिरीश महाजन ही देवेंद्र फडणवीस यांच्या आसपास दिसत नाहीत.
पंकजा मुंडे किंवा विनोद तावडे यांना विधानसभा, विधानपरिषद किंवा पक्षाच्या कार्यकारिणीत आणण्याचा मानस फडणवीस यांचा दिसत नाही. नागपुर तसंच विदर्भातील गडकरी समर्थक कधीच किनाऱ्याला लागले आहेत. यशोमती ठाकूर यांनी भाजपातील आमदारच महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं विधान केल्यानंतर त्याचा समाचार घ्यायला काँग्रेस मधून भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील पुढे आले.
एकूणच भाजापातील परिस्थिती दाखवली जातेय तशी मजबूत नाहीय. कधीकाळी ऑस्ट्रेलियाच्या टीम सारखं खेळणाऱ्या भाजपाच्या टीममध्ये ही आता फूट पडलेली स्पष्टपणे दिसून येत आहे.