मान्सून परतीच्या तयारीत आहे का?

यंदा पावसाचा मुक्काम वाढला असल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत. पण सप्टेंबरमध्ये पाऊस पडणं हा निसर्ग चक्राचा भाग आहे का, मान्सून राज्यातून गेला हे कधी जाहीर केले जाते, हिवाळी पाऊस आणि अवकाळी पाऊस यात फरक आहे का, यासर्व मुद्दयांचे विश्लेषण केले आहे पुणे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी;

Update: 2022-09-20 05:21 GMT

१-जून ते सप्टेंबर ह्या ४ महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्रातून मोसमी पाऊस (मान्सून) निसर्गाने ठरवून दिलेल्या त्याच्या सरासरी कालावधीत म्हणजे साधारण १०० ते १२० दिवसात हजेरी लावून निघून जाणे आवश्यक असते, असे झाले तरच मान्सूनचे त्या वर्षीचे त्याचे वर्तन हे नैसर्गिक व सुयोग्य समजावे. आणि त्यामुळेच उर्वरित त्या वर्षभरातील म्हणजे मार्च - एप्रिल पर्यंतच्या वातावरणीय घटना (नैसर्गिक चालत आलेल्या) सुयोग्य पद्धतीने घडून येतात.

उदाहरणार्थ मार्चच्या मध्यापर्यंत पडणारी आवश्यक थंडी, नक्षत्रानुसार परतीचा पाऊस, नियमित निर्मित सागरी होणारे चक्रीवादळे, कमी गारपीट, माफकच पडणारे धुके, थंडीत कमी भू-दवीकरण(बादड) व भू-स्फटिकिकरण (ग्राऊंड फ्रॉस्ट) इत्यादि वातावरणीय सुसंगत पीक उपयोगी असे नैसर्गिक सुयोग्य बदल शेतीसाठी घडून येतात. म्हणूनच मान्सून वेळेतच परतावा हेच शेतीसाठी अतियोग्य होय.

२ -अधिक पाऊस होण्यापेक्षा सरासरी इतकाच पाऊस होणे गरजेचे असते. थोडक्यात मान्सून कालावधीच्या १०० ते १२० दिवसात प्रत्यक्षात पाऊस किती जोरात(तीव्रतेने) पडला ह्यापेक्षा किती दिवस पडला म्हणजे पावसाचे दिवस ( नंबर ऑफ रेनी डेज) किती हे सगळ्यात महत्वाचे असते. भले पाऊस कमी पडू दे पण पावसाचे दिवस वाढणे महत्वाचे असते. त्यातूनच अधिक भू-जलशोषण होऊन फुकटचे व्यय जाणारे पाण्याचे समुद्राकडे वहन कमी होते.

३-शेतकरीच काय पण एकूणच जनतेत अशीही धारणा असते की मान्सून उशिरा गेला तर आपल्याला पावसाला अधिकचा कालावधी म्हणजे अधिक पाणी व अधिक भू- जलपातळी व अधिक भू-जलधारणक्षमता वाढ, अधिकचे जमिनीवरचे जल साठवण होईल, असे वाटते. पण ते तसे नसते. नैऋत्य मान्सून म्हणजे मोसमी पाऊस जर वेळेत परतला तरच त्या पुढील ईशान्य मोसमी किंवा हिवाळी पाऊस तामिळनाडू राज्यात जोमाने नाचत येतो. त्याचा फायदा कधी-कधी वातावरणीय प्रणालीच्या व्यापक प्रसारामुळे महाराष्ट्रपर्यंतचे क्षेत्र त्या हिवाळी पावसाच्या प्रभावाखाली येऊन आपल्या रब्बी पिकांना त्याचा फायदा होतो.

४-परतीचा पाऊस, ईशान्य मोसमी पाऊस, किंवा हिवाळी पाऊस ही एकच की वेगवेगळी नांवे आहेत की पावसातही काही फरक आहे? म्हणजेच परतीचा व हिवाळी पाऊस सारखेच आहेत काय?

तर उत्तर आहे, नाही ! तर (अ)परतीचा पाऊस व (ब)हिवाळी किंवा ईशान्य मोसमी पाऊस अशा दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत.

५ - हिवाळ्यात ईशान्य मोसमी वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे बंगालच्या उपसागरावरून ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या ३ महिन्यात तामिळनाडू राज्याच्या किनारपट्टीवर आदळतात व तेथे त्या राज्यात जो पाऊस होतो त्यास ईशान्य किंवा हिवाळी पाऊस म्हणतात.

६ - परतीचा पाऊस हा १ सप्टेंबर नंतर सुरुवात होऊन १ ऑक्टोबरनंतर देशातून निघून जाणे अपेक्षित असते परंतु तो कधी कधी वाढीव कालावधीही घेतो.

परतीचा पाऊस हा जेंव्हा प्रथम काहीसे स्वच्छ आकाश व अतिउष्णता अशा वातावरणातून नंतर तयार होणाऱ्या संवहनी क्रियेद्वारे शक्यतो दुपारनंतर पडणारा पाऊस असतो. ( येथे संवहनी क्रियेद्वारे म्हणजे सूर्याच्या उष्णता ऊर्जेने जमिनीचा पृष्ठभाग तापून जेंव्हा जमिनीने शोषलेले पाण्याचे बाष्पभवनातून ऊबदार अशा दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात उर्ध्वगमन होते व ठराविक उंचीवर त्याला मिळालेल्या थंडाव्यातून पडणाऱ्या पावसाला संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस म्हणतात. ) ह्यालाच आपण परतीचा पाऊस म्हणतो. ज्या मार्गाने मोसमी(मान्सून) पाऊस केरळपासून राजस्थानपर्यंत जातो, तोच मोसमी पाऊस त्याच मार्गाने माघारी फिरतो त्याला परतीचा पाऊस म्हणतात. साधारण एक महिना कमी अधिक कालावधीत तो देशातून परततो.

७. आता परतीचा पाऊस व त्याची तारीख ही एक घटना असली तरी संदर्भानुसार त्याच्या वेगवेगळ्या तारखा मीडियाकडून वाचकांच्या, श्रोत्यांच्या कानावर कशा आदळवल्या जातात. जनतेत त्यामुळे कसा गोंधळ उडतो, त्या तारखा व त्यांचे वर्गीकरण कसे तेही आपण बघू या!

i) देशातून म्हणजे राजस्थानच्या अतिवायव्येकडील टोकाकडून पाऊस परत फिरण्यास सुरवात होणारी आतापर्यंतच्या डेटावरून असलेली सरासरी तारीख

ii) देशातून दक्षिण द्विपकल्पतील राज्यातून पाऊस पूर्णपणे निघून जाण्याची व तामिळनाडूत स्थिरावण्याची आतापर्यंतच्या डेटावरून असलेली सरासरी तारीख

iii) वरील (i) मधील त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख

iv) वरील (ii) मधील त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख

v) महाराष्ट्रात पाऊस परत फिरण्यास सुरवात होण्याची त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख

vi) महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे निघून जाण्याची त्यावर्षीची प्रत्यक्ष तारीख.

(हयात महाराष्ट्रातील v व vi मधील डेटयानुसार सरासरी तारखा की साधारण ज्या अनुक्रमे १ व १० ऑक्टोबर आहेत त्या विचारात घेतल्या नाहीत )

आता वरील क्रमानुसार ह्या तारखा कोणत्या आहेत ते बघू या!

i) १ सप्टेंबर

ii) ३० सप्टेंबर(अलीकडील आकडेवारीवरून ही तारीख १५ ऑक्टोबर पर्यंत गेली आहे)

iii) मागील वर्षी २०२१ मध्ये उशिर झाल्याने ही तारीख ६ ऑक्टोबर होती. ह्या वर्षी २०२२ ला ही तारीख १७ ते २० सप्टेंबर किंवा त्यानंतर अपेक्षित ठेवू या !

iv) मागील वर्षी २०२१ मध्येही उशिरामुळे तारीख २३ ऑक्टोबर होती. ह्या वर्षी ही तारीख ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान किंवा त्या नंतर अपेक्षित ठेवू या!

v) मागील वर्षी २०२१ मध्ये महाराष्ट्रात ही तारीख १५ ऑक्टोबर होती. ह्या वर्षीची येणारा काळ ठरवेल

vi) मागील वर्षी २०२१ मध्ये उशिरामुळे महाराष्ट्रात ही तारीख १७ ऑक्टोबर ही होती. ह्या वर्षीची येणारा काळ ठरवेल

खरं तर ह्या सर्व तारखात राजस्थान मधून मोसमी पाऊस परत फिरण्यास सुरवात होणारी व संपूर्ण देशातून मोसमी पाऊस निघून पण फक्त तामिळनाडूमध्ये वेगळं नांव धारण करून तेथे पाऊस सुरु होण्याची तारीख ह्या दोनच तारखा महत्वाच्या आहेत. कारण महाराष्ट्रातील ह्या दोन व देशाच्या दोन तारखा ह्यामध्ये विशेष असा काही जास्त दिवसांचा फरक नसतो. म्हणून कोणता संदर्भ सांगून तारीख सांगितली हे ही वाचकाने लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणजे मनी गोंधळ होत नाही .

८- नैऋत्य मान्सूनची (परतीचा पाऊस) माघारीची सुरुवात

देशाच्या अतिवायव्य टोकाकडील पश्चिम भागातून सहसा १ सप्टेंबरपूर्वी परतीच्या पावसाची माघारी फिरण्यास सुरवात होत नाही तर ती १ सप्टेंबर नंतरच होते. तर त्याच्या घोषणेसाठी खालील मुख्य वातावरणीय बदलांचा विचार केला जातो.

i) सलग पाच दिवस त्या भागात पावसाची गतिविधिता थांबणे. म्हणजेच सलग पाच दिवस त्या भागात हवेच्या शुष्क वातावरणाचे प्राबल्य दिसते का? हे बघितले जाते .

ii) जमिनीपासून साधारण दीड किमी उंचीपर्यंत हवेचे उच्च दाबाची प्रत्यावर्ते (म्हणजे चक्रीवादळाच्या विरुद्धची स्थिती म्हणजे ज्यातून हवेच्या उच्च दाब वातावरणातून तयार होणारा व घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बाहेर फेकणारा वेगवान भोवरा वारा) तयार होणे. म्हणून तर परतीचे मोसमी वारे जमिनीलगत पूर्वेकडून अंगावर आल्यासारखे भासतात.

iii) हवेतील आर्द्रता खूप कमी होणे. हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी होणे म्हणजेच थोडक्यात हवेतील आर्द्रतेच्या सातत्याने कमी होण्याच्या प्रमाणाचे अवकाशीय सातत्याचे निरीक्षण करणे. हे डोळ्यापुढे प्रतिमा उभी राहील अशा उपग्रहीय चित्रातून तसेच दैनिक त्या भागातील रेखाटलेल्या 'टी-फाय' आलेखातून बघितले जाते.

९- आता देशातून परतीचा पाऊस पूर्णपणे निघून जाणे म्हणजे नैऋत्य मान्सूनचे सरासरी १ ऑक्टोबर नंतरच संपूर्ण देशातून परतीचा प्रवास करून पूर्णपणे निघून जाणे होय. देशाच्या दक्षिण द्विपकल्पतील तामिळनाडू, केरळ माही,पॉन्डीचेरी काराईकल, आंध्र , येणम वगळता सर्व राज्यातून त्याचे पूर्णपणे उच्चाटन होते. अशावेळी देशात वाऱ्याच्या अभिसरणाच्या दिशेत होणारे बदलच दाखवून देतात की, देशात नैऋत्य मान्सूनचा अंमल संपला. हे बघितल्यानंतरच परतीच्या पावसाचे देशातून उच्चाटन झाले असे घोषित केले जाते. त्याचबरोबर तामिळनाडू राज्यात ईशान्य मान्सून किंवा हिवाळी पावसास सुरवात झाली असे समजले जाते.

माणिकराव खुळे,

Meteorologist (Retd.), IMD Pune.



Similar News