ठाणं कोण जिंकणार ?

राज्यात मुंबई वगळता उर्वरित महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. २० वर्षांपुर्वी म्हणजे २००२ मध्ये अशाच पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी ठाण्यात शिवसेनेना-भाजप युतीने सत्ता स्थापन केली होती. आता युती नसली, तरी २०१७ च्या निवडणुकीचा अनुभव पाहता ही एकसदस्य निवडणुक सत्ताधारी शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे होती. कारण एकगठ्ठा मते मिळवण्यास शिवसेनेस अवघड जाणार होतं.

Update: 2022-01-28 13:13 GMT

राज्य सरकारने मुंबई वगळता उर्वरित महापालिका निवडणूकांसाठी त्रिस्तरीय पॅनल पध्दतीने निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामध्ये मुंबईनंतर राज्याचे लक्ष लागले आहे ते ठाणे महापालिका निवडणूकीकडे..यावरच मॅक्स महाराष्ट्रचे अनिल साबळे यांचा खास रिपोर्ट...

राज्यात मुंबई वगळता उर्वरित महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. २० वर्षांपुर्वी म्हणजे २००२ मध्ये अशाच पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी ठाण्यात शिवसेनेना-भाजप युतीने सत्ता स्थापन केली होती. आता युती नसली, तरी २०१७ च्या निवडणुकीचा अनुभव पाहता ही एकसदस्य निवडणुक सत्ताधारी शिवसेनेच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे होती. कारण एकगठ्ठा मते मिळवण्यास शिवसेनेस अवघड जाणार होतं.

राज्य निवडणूक आयोगाने २५ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाण्यासह १० प्रमुख महापालिकांची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने घेण्याचे जाहीर केले होते. याचा सर्वाधिक फटका ठाण्यात शिवसेनेला बसण्याची शक्यता होती. २०१७ सालच्या निवडणूकीचा विचार केला असता मोदी लाटेत चार सदस्यीय पॅनेलमुळे शिवसेनेने ठाण्यात एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र एकसदस्यीय निवडणूक झाल्यास एकगठ्ठा मते मिळवण्यास अवघड होणार असल्याने बहुसदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यासाठी सत्ताधारी शिवसेना आग्रही होती. तर दोनसदस्यीय प्रभागासाठी राष्ट्रवादी आणि एकसदस्यीय प्रभागासाठी काँग्रेस आग्रही होती. भविष्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न पालिकांमध्येही राबवण्याच्या दृष्टीने त्रिसदस्यीय प्रभागाचा तोडगा काढण्यात आला आहे.

काँग्रेस आघाडी सरकारने २००२ साली त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणूक लागू केली होती. मात्र एकगठ्ठा मते मिळवण्यास आघाडी अपयशी ठरली. ठाणे महापालिकेत २००२ साली एकूण ११५ जागांसाठी त्रिसदस्यीय पॅनेल पद्धतीने निवडणुका झाल्या होत्या. त्या वेळी शिवसेनेने सर्वाधिक ४९ जागा मिळवल्या तर युती मित्रपक्ष भाजपने १४ जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे ६३ नगरसेवकांची फौज घेऊन शिवसेना-भाजप युतीने पालिकेवर झेंडा फडकवला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. राष्ट्रवादीला २४ तर काँग्रेसला १३ जागा मिळाल्या होत्या.

२००२ साली अनेक दिग्गजांना बसलावं लागल घरी

२००२ साली झालेल्या त्रिसदस्यीय निवडणुकीत अनेक दिग्गजांना फटका बसला होता. राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रताप सरनाईक यांना २००२ साली शिवसेनेच्या उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय काँग्रेसचे दिवंगत नेते बाळकृष्ण पूर्णेकर, अशोक राऊळ, पूर्वाश्रमीचे काँग्रेसी व सध्या भाजपवासी झालेले नारायण पवार, मनोज प्रधान अश्या अनेक दिग्गजांना मतदारांनी घरी बसवले होत.

कळवा येथील खारेगाव उड्डाणपुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नरेश म्हस्के यांना नारदमुनीची उपमा दिली. पण, हीच उपमा समजण्यात म्हस्के यांची चूकच झालेली आहे. कारण, ते कलियुगातील नारद आहेत, असा टोला माजी खासदार आनंद परांजपे परांजपे यांनी लगावला. बापाची चप्पल मुलाच्या पायात आल्याने बापाची अक्कल येत नाही. असा टोला लगावत आनंद परांजपे यांनी खासदार श्रीकांत शिदेंवर निशाणा साधला.

यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली पण ते खोटं बोलत आहेत, असे सांगितले. कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रवादीची पत्रकार परिषद झाली म्हणून पुन्हा आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली, आनंद परांजपे यांनी मला पक्ष निष्ठा शिकवू नये, मी मग्रूर नाही मात्र जनतेच्या पाठिंब्याचा गर्व आहे. घरी बसलेल्या, अडगळीत पडलेल्या नेत्यांना संधी मिळावे म्हणून हे सगळं सुरु आहे. महापौर नरेश म्हस्के असं महापौर नरेश म्हस्के म्हणाले.

दिवंगत खासदार प्रकाश परांजपे साहेब यांचे योगदान विकास कामांसाठी सर्वश्रुत आहेत. मात्र परांजपे साहेब यांच्या दुःखद निधनानंतर त्यांची चप्पल त्यांच्या मुलाला घालायला दिली होती. पण आपल्या पित्याची चप्पल पुत्राच्या पायात बसली नाहीच पण आपल्याच पित्याच्या चप्पलेचा अवमान करुन दुसऱ्याची चप्पल डोक्यावर घेणाऱ्या या पुत्राला जनतेने दोन वेळा घरी बसविले याचे भान आता ठेवणे गरजेचे आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात विकासाचं बाळ सात वर्षाच झाल असल तरी या सात वर्षाच्या बाळाने विकास कामांचा डोंगर मतदार संघात उभा केला ते जनतेला ज्ञात आहे. एवढेच नव्हे तर सुरु असलेले प्रकल्प हे टाईमलाईन नुसारचं पूर्ण होतील तेव्हा या प्रकल्पांच्या उद्घाटनांना गैरहजर न राहता 'टाईम' वर उपस्थित रहा असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

सतत दोन दिवस नारद, नारदचा गजर करणाऱ्या परांजपे आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लक्षात ठेवावे नारद हा बुध्दीमान होता. त्यामुळे भविष्यांत गारद होण्याची वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी हा गजर वेळेवरचं थांबविला तर ते हिताचे होईल. असा सल्ला शिवसेनेने तर दिलाचं पण वेद, युग, धर्म, ग्रंथ याचं पारायण आजच्या पत्रकार परिषदेत सांगून आनंद परांजपे यांना नेमकं काय म्हणायचं होतं यांच कोड सर्वांना पडलं आहे. त्यामुळे विकासाचे बाळ हे वाढत राहणार, विकास कामाचं डोंगर रचतं राहणार, टाईमलाईन नुसार सर्व प्रकल्प पूर्ण होतचं जाणार यात जरा ही शंका नाही. कल्याण लोकसभा क्षेत्रात पुढच्या महिन्यात पाचवी आणि सहावी रेल्वे लाईनचं उद्घाटन होणारचं आहे. इतर प्रकल्प सुध्दा मार्गी लागणार आहेत तेव्हा निश्चितपणे या उद्घाटनाच्या कार्यक्रमांना आनंद परांजपे यांना मंत्रोच्चार करण्यासाठी निश्चितपणे निमंत्रण देण्यात येईल. असे शिवसेनेने म्हटले.

या सर्व घडामोडीनंतर ठाण्यात राजकारण तापलं गेल त्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचे काम कोण करत आहेत आनंद परांजपे की महापौर नरेश म्हस्के हे येणारा काळच ठरवेलं. मात्र खारेगाव आर ओ बी पुलाच्या श्रेयवादावरून ठाण्यात राजकारण तापलेल्या राजकारणात कुणी कुणाचा बाप काढला... तर कुणी कुणाला नारद म्हणालं... आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीत बिघाडी होणार का ? त्यासोबत २० वर्षांनंतर ठाण्यात इतिहासाची पुनरावृत्ती होणार का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Full View

Tags:    

Similar News