लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Update: 2020-07-19 01:25 GMT

राज्यात लॉकडाऊनबाबतचे अधिकार जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना राज्य सरकारने दिलेले आहेत. पण अनेक ठिकाणी आता लॉकडाऊन वाढवण्याबाबत नागरिकांचा विरोध वाढू लागलाय. तर दुसरीकडे केवळ काही लोकांच्या दबावामुळे लॉकडाउन लागू करण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील अधिकाऱ्यांना महत्त्वाची सूचना केलेली आहे.

लॉकडाऊन लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सुचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये. सरकारने प्रयोगशाळा १३० पर्यंत वाढवल्या आहेत, एन्टीजेनबाबत सूचना दिल्या आहेत.

धार्मिक, समाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू नये. काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल. सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

विविध पालिकांनी त्यांच्या क्षेत्रात लॉकडाऊन केले आहे. त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर रुग्ण आणि त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे, रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे परिणामत: मृत्यू दर लक्षणीयरित्या कमी करणे यासाठी झाला पाहिजे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्याना सांगितले.

Similar News