मोदींच्या सभेकडे जनतेने का फिरवली पाठ? ‘ही’ आहेत कारणं...

Update: 2019-04-01 12:31 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराला आज वर्धा या ठिकाणाहून सुरुवात केली. आज सकाळीच मोदींनी मराठी भाषेत ट्विट करत ही माहिती दिली होती. मात्र, मोदींच्या या ट्विटला महाराष्ट्रातील वर्धा वासियांना म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. सभेतील बराचश्या खुर्च्या रिकाम्या असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपने 2014 च्या निवडणुकींच्या प्रचाराची सुरुवात वर्धा येथे सभा घेऊन केली होती. 2014 च्या निवडणूकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे भाजपला वर्धा लकी असल्यामुळे भाजपने महाराष्ट्रात प्रचाराची सुरुवात वर्धा येथून केली. मात्र, जवळ जवळ 18 एकरच्या मैदानावरील अर्ध्याहून अधिक भाग रिकामा होता. तसंच मोदींचे भाषण सुरु असतानाही या ठिकाणी लोक उठून जात होते. या सभेच्या मागील खुर्च्या रिकाम्या असल्याचे फोटो देखील व्हायरल झाले आहेत. उन्हामुळे आणि सभेच्या ठिकाणी मंडप नसल्यानं लोक कमी आले असल्याचं बोललं जात असलं तरी, आम्ही स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली असता काही वेगळी कारण समोर आली आहेत. या संदर्भात आम्ही स्थानिक पत्रकार मंगेश चौरे यांच्याशी बातचित केली असता त्यांनी खालील मुद्दे सांगितले...

वर्धा हा कॉग्रेसचा बाल्ले किल्ला आहे. या जिल्हात मागच्या वेळेस जनतेने मोदी लाटेत खासदार रामदास तडस यांना निवडून दिले. मात्र, तडस यांनी एक विशिष्ट लोकांनाच जवळ केले. त्यामुळे अलिकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्धा येथे भाजपातील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सभेला 15 हजारांच्या पेक्षाही कमी गर्दी होती असं मत चौर यांनी व्यक्त केलं.

मोदींची क्रेज कमी झाली

2014 च्या तुलनेत 2019 ची क्रेज कमी झाली आहे. लोकांना आता समजायला लागलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच मोदींच्या 2014 च्या आणि आत्ताच्या भाषणात फारसा फरक नसल्यानं जनतेला भाषण लक्षात आली आहेत.

मोदींची दररोज टीव्हीवर दिसणारी भाषण...

नरेंद्र मोदींची भाषण लोक दररोज टीव्हीवर पाहात असतात. त्यात नावीन्य असं काही नसतं त्यामुळे लोकांनी उन्हात जाऊन भाषण पाहणं टाळल्याचं चौरे यांनी मॅक्स महाराष्ट्रला सांगितलं आहे.

Similar News