काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार का?

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला (congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षांतर्गत गटबाजी आणि महाविकास आघाडीमधील समन्वयाचा अभाव यामुळे काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे?

Update: 2022-06-20 18:08 GMT

महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत (MLC) काँग्रेसला (congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे तर केवळ भाई जगताप (Bhai jagtap) निवडून आले आहेत. भाजपचे (BJP) पाचवे उमेदवार प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा विजय झाला आहे. पण चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे झाल्याची कबुली पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. तसेच महाविकास आघाडीमधील शिवसेनेची अतिरिक्त मतं फुटल्याची चर्चा आहे.

काँग्रेसची मतं फुटल्याची थोरात यांची कबुली

"काँग्रेसला या निवडणुकीत सगळ्यात मोठा धक्का बसला आहे, काँग्रेसचीच मतं फुटली" अशी कबुली पक्षाचे ज्येष्ठे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना थोरात यांनी पक्षांतर्गत गटबाजीतून काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे सांगितले आहे. तसेच यासाठी आपण नेते म्हणून जबाबदारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. "सरकार म्हणून विचार करावा लागेल, आमचीही मतं फुटली, एकत्र म्हणून सरकार चालवतो पण कुठे तरी चुकत आहे" असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याचे दिसते आहे. तर दुसरीकडे चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा होती. नाना पटोले गटाच्या नाराजीचा फटका हंडोरे यांना बसला आहे. नाना पटोले ह मतमोजणी सुरू होण्याआधीच नागपूरला रवाना झाल्याने ही चर्चा अधिक वाढली. पण आपण कौटुंबिक कार्यक्रमासाठी नागपूरला आल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिले आहे.

पण महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांमधील आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे हे नाराज आमदार आमच्या पाचव्या उमेदवाराला मतदान करतील अशी आम्हाला आशा होती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता बाळासाहेब थोरात राजीनामा देणार का आणि काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Similar News