भगवान विष्णूने वराह अवतार घेऊन पृथ्वी वाचवली तर आता ४० वराह महाराष्ट्र वाचवतील असे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दिल्लीच्या बापाच्या नावाने मत मागवून दाखवा, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे, त्याला उत्तर देतांना "कोणी कोणाच्या बापाच्या नावाने मत मागितले हे सगळ्यांना माहीत आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा नुवडणुकीत 2019 मध्ये कोणाच्या नावाने मत मागितले हे सर्वाना माहीत आहे. जनतेने कोणाला मते द्यायचे हा जनतेचा अधिकार आहे" असे उत्तर त्यांनी दिले आहे.
आपली भूमिका मांडणाऱ्या आमदारांना रोज खालच्या शब्दात बोलून महाराष्ट्राच्या राजकारणा स्तर खाली नेण्याचे काम शिवसेना करत आहे, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
"तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता आले नाही आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करत आहेत, नाचता येईना अंगण वाकडे" अशी परिस्थिती शिवसेनेची आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. "तुमच्या अहंकाराला कंटाळून सेनेच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याचा दोष भाजपला देण्याची गरज नाही. हे सर्व आमदार त्या सभागृहाचे सदस्य आहेत जिथे कायदे होतात, त्यामुळे असे कोणी म्हणत असेल तर असे वक्तव्य करणाऱ्यांची बौध्दिकता तपासलीच पाहिजे" असा टोला त्यांनी लगावला.
विधान भवनाचा रस्ता वरळीतून जातो असं बोलणं हे चुकीचे आहे, त्यामुळे अशा पद्धतीच्या धमक्या जर कुणी देत असेल तर लक्षात ठेवा याची व्याजासकट परतफेड करावी लागेल, असाही इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.