सरकार स्थापन करण्यासाठी फडणवीस यांना जुलैची डेडलाईन आहे का?

Update: 2022-06-21 05:31 GMT

शिवसेनेचे (Shivsena) मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरुद्ध बंड केल्याची चर्चा सुरू झालेली असताना, यामागे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची रणनीती आहे का, अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपने सातत्याने सरकार पडण्याच्या डेडलाईन दिल्या आहेत. पण आता एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे किमान 20 आमदार संपर्क क्षेत्रात नसल्याने खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटले तर ठाकरे सरकार कोसळू शकते अशीही भीती व्यक्त होते आहे.

या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस सरकार स्थापनेचा दावा करु शकतात का, अशी चर्चा सुरू आहे. कारण येत्या डिसेंबरमध्ये गुजरातसह काही विधानसभा निवडणुका होणार आहेत. जुलैपर्यंत सरकार स्थापन झाले तर तीन ते चार महिन्यांचा कालावधी मिळू शकतो, त्यानंतर राज्यातही मध्यावधी निवडणुका घेतल्या तर भाजपला फायदा होईल असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आधी राज्यसभा आणि आता विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची मतं फोडण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजप सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो अशी चर्चा आहे.

याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जूनमध्ये राजकीय वादळ येणार असे भाकीत केले होते. तसेच सरकार पडेल असा दावाही केला होता. विधान परिषदेच्या निकालानंतर नारायण राणे यांनी यावर भाष्य करणे टाळले असले तरी नॉटरिचेबल शिंदे कुठे आहेत असे विचारले तर काही सांगायचे नसते, असे उत्तर पत्रकारांना दिले. तसेच सरकार पडणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना एक दिवस तरी शांत बसू द्या असे वक्तव्य केले आहे.

या सर्व घडामोडींवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण महाविकास आघाडीची मतं फोडण्यात यशस्वी ठरल्यानंतर त्यांची पुढची रणनीती काय, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Similar News