प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय व प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. सदर व्यक्तीला या देशातील सैनिकांचे झालेले बलिदान हा एक 'विजयाचा' क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर या देशातील खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. सदर इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या देखील गप्पा मारत असल्याचे अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे, न्यायालयाचा हाच खऱ्या अर्थाने अवमान आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रिमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या. महाविकास आघाडी सरकारने या टीआरपी घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते.