Home > मॅक्स रिपोर्ट > पुढाऱ्यांचे दुर्लक्ष रस्त्यांची वाट लागली...

पुढाऱ्यांचे दुर्लक्ष रस्त्यांची वाट लागली...

बीड मतदारसंघातील पिंपरगव्हण ते आरटीओ कार्यालय तसेच शिरसमार्ग जोडणारा 10 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो गेल्या 5 ते 7 वर्षांपासून खराब असल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे,विषयीचा मॅक्स महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट...

पुढाऱ्यांचे दुर्लक्ष रस्त्यांची वाट लागली...
X

बीड मतदारसंघातील पिंपरगव्हण ते आरटीओ कार्यालय तसेच शिरसमार्ग जोडणारा 10 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो गेल्या 5 ते 7 वर्षांपासून खराब असल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर आरटीओचे ट्रायल कार्यालय असून या रस्त्यावर वरून आरटीओ पासिंगसाठी जाणारी जी वाहने आहेत ती याच रस्त्याने जात आहेत, त्याचबरोबर स्वतः आरटीओ देखील याच रस्त्याने जातात... तसेच या रस्त्यावर येणारी जी गावे आहेत त्यांना गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्यावरून ये -जा करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

प्रजिमा 28 ते इतर जिल्हा मार्ग 16 राज्य मार्ग 45 असुन पिंपरगव्हण रस्ता असुन याची लांबी 10 किलोमीटर आहे व सदर रस्ता हा डांबरी आहे, सदर रस्ता हा सद्यस्थितीत खराब झालेला आहे, हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी विशेष रस्ता दुरुस्ती कार्यक्रमांमध्ये शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता, मंजूर न झाल्यामुळे सदर काम अद्याप पर्यंत झालेलं नाही, पुन्हा आम्ही सध्या स्थितीमध्ये प्रस्ताव दुरुस्तीसाठी सादर करत आहोत, सदर रस्ता दुरुस्तीसाठी 50 लक्ष रुपयांचा शासनास सादर करत आहोत असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते चाटे यांनी सांगितले.



खराब रस्त्यामुळे आम्हाला याचा फार त्रास होतो. आम्ही दोन-तीन वेळा घसरूनही पडलो. पण या रस्त्याची दुरावस्था काही नीट होताना दिसत नाही. आम्हाला कमरेचा त्रास सुद्धा होत आहे. येता-जाताना तर खूप त्रास होत आहे. पाऊस पडल्यावर तर गाडी चालवता येत नाही. आम्हाला येता जाताना खूप रस्त्याचा त्रास होतो,आम्ही येऊन जाऊन शेती करतो आमचं सर्व शेतीवरच आहे. आम्ही अनेक वेळा सांगितलं आमदार खासदार यांनाही सांगितलं पण कोणीच दुरुस्ती करत नाही. या रस्त्यासाठी आम्ही कोणाकडे जायचं कोणाकडे या रस्त्याची दाद मागायची, आम्हाला रोज यावं लागतं... आमच्या शेतामध्ये पिकलेलं अन्नधान्य आम्हाला आणण्यासाठीही या रस्त्याने यावं लागतं त्यामुळे याचा खूप त्रास होतो, आम्हाला ते वाहून न्यावं लागतं... रस्त्याच्या दुरावस्थेमुळे आम्ही ते कसं वाहून न्यावं आमची एवढीच मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, असे महिला शेतकरी प्रेरणा मोराळे यांनी सांगितले.

पिंपळगव्हाण फाटा ते शिरसमार्ग रोडचे अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. याच्याकडे राजकारणी लोक लक्ष देत नाहीत. पुढारी लोकही लक्ष देत नाहीत. या तालुक्याचे आमदार लक्ष देत नाहीत. सर्वतोपरी लोकांनी याकडे लक्ष द्यावं व हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, असे काशिद यांनी सांगितले.


माझी या खड्ड्यामध्ये काल गाडी पडली पडल्यामुळे सगळं ब्रेक जाम झालं आहे. सगळी बेजारी होती 100 जागेवर रस्ता फुटलेला आहे कुठेही, या रस्त्याने फार बेजारी चालवली आहे दळण जरी आणलं तरी, पाण्यात पडतं तसंच न्यावं लागतं. या रस्त्याने वागायलाच येत नाही. पाऊस आला की नुसते ढवचं होतात... कुणी कुणी गाडी घाला म्हणून समजतच नाही... खड्डा किती आणि पाणी किती हेच कळत नाही आम्हाला... लई अवघड चाललंय या रस्त्यानं...मजबुरीचं काम झालं आहे... गाडी बाहेर काढली की भेवचं वाटतय... गाडीवर बसले की अंगावर थर काटा फुटतो हा रस्ता पाहून... अशी परिस्थिती चालली आहे आमची... काल माझी गाडी पडली दळणही पडलं घरी पीठही मिळालं नाही त्यामुळे रात्री खिचडी खावी लागली... बळच वागावं लागतं या रस्त्यानं... ती आलेली गाडी कशी डौलत चालली आहे फारच बेकार परिस्थिती असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


म्हसोबा फाटा ते शिरस मार्ग पर्यंत या रस्त्यावर पंधरा गावांचा संपर्क आहे, पंधरा गावाला या रस्त्याची खराबीमुळे त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यामुळे पाच ते दहा जणांचे हात पाय मोडले आहेत.कुणाचा हात मोडला तर कुणाचा पाय मोडला आहे, म्हसोबा फाटा ते पिंपरगव्हण फाटा तीन किलोमीटर रस्ता आहे इथपर्यंत येईपर्यंत महिला मुलं या रस्त्याने शेतामध्ये यायला भित आहेत. या रस्त्यावरच आरटीओ कार्यालयाचे ट्रायल ऑफिस आहे हे चार किलोमीटर भरत आहे, हे आरटीओ सुद्धा याच रस्त्याने जातात... विशेष म्हणजे ट्रायल घेण्यासाठी आलेली जी वाहन आहेत या रस्त्यामुळे नादुरुस्त होतात, माझी एक आरटीओ साहेबांना विनंती आहे की तुम्ही पण याच रस्त्याने येतात जातात त्याच्याकडे तुम्ही पण लक्ष द्या, आमच्या भागातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते प्रचाराच्या वेळेस याच रस्त्याने येतात जातात... या साईटच्या दहा गावांमध्ये याच रस्त्याने जावं लागतं तरी पण लोकप्रतिनिधींना हा रस्ता दिसत नाही... आश्वासन देतात आणि निघून जातात... सात ते आठ वर्षे झालं हा रस्ता स्थानिक प्रतिनिधींना दिसला नाही का...? किती लोक पडले आहेत आमच्या गावामध्ये या रस्त्यावर पडून कोणाचे पाय मोडला आहे कुणाचा हात मोडला आहे एका एका जणाला तर 70- 70 80 -80 हजार रुपये दीड दीड लाख रुपयापर्यंत खर्च आलेला आहे हा खर्च कुणी करायचा...? तरी पण हे शासकीय अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी लक्ष द्या भाऊ आमचा हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशीच आमची मागणी आहे. असे शेतकरी सचिन आगाम म्हणाले.


गेले पाच-सहा वर्षांपासून असाच आहे या ठिकाणी याच रस्त्यावर आरटीओ कार्यालयाचे ट्रायल ऑफिस आहे. या रस्त्याची फार बिकट परिस्थिती आहे पहिले हा रस्ता चांगला होता बैलगाडीमध्ये जरी पाण्याचा ग्लास भरून ठेवला तरी तो सांडत नसायचा... आता मोकळ पण चालता येत नाही... इकडे आरटीओ कार्यालय आहे आणि आरटीओ ला सुद्धा जाण्यासाठी हाच रस्ता आहे. त्यांनी काही गाड्या बनवून आणल्या किंवा त्याची काही दुरुस्ती असेल तर... बनवून आणलं तर पुन्हा तिथपर्यंत असतं त्या गाड्यांची खराब होते... आणि पासिंग ला पण त्यांना भरपूर अडचणी येतात, हा जो खड्डा आहे तो आम्ही कालच पाणी या ठिकाणावरून काढून दिलं होतं पण पुन्हा खड्याची जशी तशी अवस्था होऊन जात आहे. गेल्या पाच वर्षापासून अशीच अवस्था या रस्त्याची आहे. होईल तेवढ्या लवकर आणि कुणाची जीवनाची हानी होण्याअगोदर... आणि कुणाचा जीव जाण्याअगोदर हा रस्ता करावा अशीच आमची मागणी आहे असे शेतकरी जब्बार शेख म्हणाले.

या रस्त्यामुळे पटापटा पडत आहेत कुणाच्या हात मोडतात कुणाचे पाय मोडतात. सारे गर्दडेची -गर्दाडे गर्दाडे पडलेआहेत. सडकांनी सारे खड्डे झाले आहेत... एक जण पडतात त्यावेळेस मी इथेच बसलेली असते. अनेक वेळा पाणी पाजलं उठवलं... गाड्या सटकतात आपटतात लोक पडतात. गाड्या ते बोकांडी घेऊन पडत आहेत... लई रस्ता खराब आहे. उन्हाळ्यात उसाची ट्रक फसली होती ट्रॅक्टर आणून काढली... इथं एक परवा दिवशी ही ट्रक फसली होती ती क्रेन आणून काढली... लई रस्ता बेकार झाला आहे. रस्ता व्हावा माणसांची लई आपदा होत आहे. सारे दूधवाले आपटतात... कॅंडी निसटत आहेत... एवढा रोड चांगला झाला म्हणजे बरं होईल, असे ग्रामस्था सुशालाबाई आगाम म्हणाल्या.



हा रस्ता गेल्या बऱ्याच दिवसापासून खराब झालेला आहे. या रस्त्यावर बऱ्याच गावाचा संपर्क आहे. या रस्त्यामुळे लोकांना त्रास होत आहे जास्त खड्डे पडल्यामुळे लोकांना याचा मोठा त्रास होत आहे, अनेक लोकांच्या गाड्या या रस्त्यावर स्लिप होत आहेत दोन दिवसांपूर्वीच्या रस्त्यावर गाडी स्लिप झाली आणि एक जणांचा हात फॅक्चर झाला आहे, आम्ही बऱ्याच वेळा या रस्त्यासाठी विनंती केली आहे, प्रशासन कुणीही या रस्त्याकडे दखल देत नाही, असे ग्रामस्थ राम आगाम यांनी सांगितले.

Updated : 25 Sep 2022 12:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top