भीक मागून खाणाऱ्या मुलाचा चित्रपट दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये
सामाजिक विषमतेमुळे वर्षानुवर्षे अंधाराच्या खाईत लोटलेल्या मरीआईवाले समाज भीक मागून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो आहे. सातत्याने या समाजातील लोक पोटासाठी भटकंती करत राहतात. समाजाचे दुःख भारतीय समाजाला समजावे. त्यांचे जीवन किती अडचणीने ओतपोत भरले आहे. जीवन जगण्यासाठी मरीआईवाले समाजाचा दररोजचा चालला संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या समाजातील उच्च शिक्षित तरुण रशीद उस्मान निंबाळकर या तरुणाने केला आहे.... प्रतिनिधी अशोक कांबळेचा रिपोर्ट
X
सामाजिक विषमतेमुळे वर्षानुवर्षे अंधाराच्या खाईत लोटलेल्या मरीआईवाले समाज भीक मागून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो आहे. सातत्याने या समाजातील लोक पोटासाठी भटकंती करत राहतात. समाजाचे दुःख भारतीय समाजाला समजावे. त्यांचे जीवन किती अडचणीने ओतपोत भरले आहे. जीवन जगण्यासाठी मरीआईवाले समाजाचा दररोजचा चालला संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या समाजातील उच्च शिक्षित तरुण रशीद उस्मान निंबाळकर या तरुणाने केला आहे.... प्रतिनिधी अशोक कांबळेचा रिपोर्ट

भारतीय समाज विविध जाती,धर्म,पंथामध्ये विभागला गेले आहे. या समाजात हजारो वर्षांपासून सामाजिक विषमता चालत आलेली आहे. या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,धार्मिक विषमतेला सुरुंग लावण्याचे काम छत्रपती शाहू महाराज,महात्मा जोतिबा फुले,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांनी माणसाला माणूसपण मिळवून दिले. माणूस असूनही मनुष्य माणसानाच पशुपेक्षाही हीन वागणूक देत होता. या सामाजिक विषमतेने दबलेल्या,पिचलेल्या लोकांत चेतना पेटवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून त्यांना राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय,हक्क मिळवून दिले.
भारतीय समाजात आजही काही जाती, धर्म विकासापासून कोसो दूर आहेत. शासनाच्या विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत आजही पोहचल्या नाहीत. सामाजिक विषमतेमुळे दबलेल्या समाजाच्या दुःखाची जाणीव भारतीय समाजाला व्हावी या उद्देशाने 'मरीआईवाले' समाजातील एका युवकाने या समाजाच्या अडचणींवर चित्रपटातून भाष्य केले आहे. त्यांचे दुःख जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मरीआईवाले समाज सामाजिक विषमतेमुळे वर्षानुवर्षे अंधाराच्या खाईत लोटलेला आहे. तो भीक मागून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहे. सातत्याने या समाजातील लोक पोटासाठी भटकंती करत राहतात. समाजाचे दुःख भारतीय समाजाला समजावे. त्यांचे जीवन किती अडचणीने ओतपोत भरले आहे. जीवन जगण्यासाठी मरीआईवाले समाजाचा दररोजचा चालला संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या समाजातील उच्च शिक्षित तरुण रशीद उस्मान निंबाळकर या तरुणाने केला आहे. त्याच्या या सिनेमाचे नाव 'इरगाला' असे आहे. या सिनेमाने देशातील तसेच परदेशातील फिल्म फेस्टिवलमध्ये एन्ट्री मारली आहे. या सिनेमाचे ऑफिसियसली सिलेक्शन 12 व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाले आहे. येत्या काही दिवसात या सिनेमाचे स्क्रिनिंग होणार आहे. अशी माहिती सिनेमाचे दिग्दर्शक रशीद निंबाळकर यांनी दिली.
चित्रपटाची स्टोरी तयार करण्यासाठी आठ वर्षे लागली
रशीद निंबाळकर यांनी बोलताना सांगितले,की 'इरसाल' ही फिल्म सत्यपरस्थितीवर आधारित आहे. मी जे जीवन लहानपणापासून जगत आलो आहे. ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत. त्याच गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहेत. या समाजाच्या अडचणी काय आहेत. मुले शिक्षण का घेत नाही. जर शाळा शिकली तर त्यांच्या पुढे कोणत्या समस्या येतात. त्यांना अर्ध्यातूनच शाळा का सोडावी लागते. यासह अनेक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. इरगाला चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी गेल्या 8 वर्षांपासून स्टोरी रायटिंग करत होतो. स्टोरी लिहून झाल्यानंतर बऱ्याच चित्रपट निर्मात्याकडे गेलो, पण त्यासाठी एकही चित्रपट निर्माता तयार झाला नाही. लोकांचा विश्वास बसावा म्हणून छोटीशी शॉर्ट फिल्म बनवायचे ठरवून 'डमरू' नावाची शॉर्ट फिल्म बनवली. या फिल्मला औरंगाबाद, बेंगलोर आणि इतर फिल्म फेस्टिव्हल मध्ये अवार्ड मिळाले. महत्वाचे म्हणजे या फिल्मला दिल्ली सरकारने नॅशनल ह्यूमन कमिशन येथे स्पेशल मेन्शन म्हणून पहिला अवार्ड दिला.
इरगाला सिनेमाच्या निर्मीतीस अनेकांचा नकार
या सिनेमाचे कथानक सिनेमा निर्मात्याकडे घेऊन गेल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांनी हा सिनेमा बनवायला नकार दिला होता. पण पेनूर गावचे रहिवाशी असलेले गिरीश यशवंत गवळी यांनी या चित्रपटाची कथा ऐकून प्रोड्युसर म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. त्यांनीही नुकतेच प्रोड्युसर म्हणून पदार्पण केले होते. त्यांना समाजाची सत्यपरस्थिती सांगितली. समाजातील प्रत्येक समाजाचा उल्लेख कोठेतरी येतोच,पण या समाजाचा येत नाही. त्यामुळे हा सिनेमा बनवायला पाहिजे हे त्यांना पटवून दिले. या मरीआईवाले समाजाच्या व्यथा काय आहेत,याची माहिती इतर समाजाला होणे आवश्यक आहे. या चित्रपटात हा समाज जगत असलेले रिअल जीवन दाखवले आहे.

सुट्टीत वडिलांबरोबर रशीद भीक मागायला जायचा
रशीद निंबाळकर शाळेला सुट्टी असली,की लहानपणी आई-वडिलांबरोबर भीक मागायला जात होता. आईच्या डोक्यावर देवीचा गाडा असायचा तर वडिलांच्या गळ्यात चाबूक असायचा आई डोक्यावरील देवीचा गाडा गावातील चौकात ठेवून डोलकी वाजवत होती तर वडील हातातील चाबकाने अंगावर फटकारे मारून घेत असत. ढोलकीचा आणि चाबकाच्या फटक्यांचे आवाज ऐकून त्या चौकाच्या आजूबाजूला राहणाऱ्या महिला हातात सूप घेऊन येत असत. सुपात धान्य असायचे. त्या महिला देवीची पूजा करून धान्य झोळीत टाकत. हा समाज सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत राहतो. त्यांना भीक मागण्यातच मोठे समाधान वाटते. रशीद आठवी,नववी,दहावीत असताना शाळेला उन्हाळी सुट्टी लागली,की वडीलांबरोबर भीक मागायला जात होता. तर लोक त्यांना बोलायचे,की तुमचे हातपाय मोडले आहेत का ? या मुलाला शाळेत पाठवायला काय होते. तुमच्या समाजाला खुपच सवलती आहेत. पण या सवलती फक्त कागदावरच आहेत. असे रशीद सांगतो.
कास्ट व्हॅलीडीटी नसल्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण सोडावे लागले अर्ध्यावर
या चित्रपटात काम करणाऱ्या दामोदर पवार ला कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. पण कास्ट व्हॅलीडीटी नसल्याने त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शासनाच्या योजना या फक्त कागदावरच आहेत. त्या ग्रामीण भागातील समाजापर्यंत पोहचल्या नाहीत. केवळ कास्ट व्हॅलीडीटी नसल्याने दामोदरला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. हा समाज सतत स्थलांतर करत असल्याने यांच्याकडे जन्म दाखले नाहीत. आणखीन ही काहिजनाकडे आधार कार्ड नाहीत. या समाजातील लोक वर्षातील 2 ते 3 महिनेच गावाकडे येतात. बाकी 8 महिने पोटासाठी भटकत राहतात. या समाजातील लोक ऋतुनुसार स्थलांतर करत राहतात. म्हणजे दिवाळी आली,की मुंबईला,कोकणात जातात. उन्हाळा आला,की ज्वारीच्या सिझनला उस्मानाबाद,बीड जिल्ह्यात जातात. दुसऱ्या गावात जात असताना मुलांना कोठेही रस्त्यात जन्म देतात. त्यामुळे त्यांच्या जन्माची कोठेच नोंद होत नाही. एवढ्या लांबून गावाकडे तर माघारी येऊ शकत नाहीत. त्यापेक्षा दोन दिवस गावाकडे जाण्यापेक्षा भीक मागून पोटाला अन्न तर मिळेल. असा त्यांचा विचार असतो. त्यामुळे मुलांच्या जन्माची नोंद आढळून येत नाही. याच कारणाने जन्म दाखला निघत नाही.
लोक दिवाळीचा आनंदोउत्सव साजरा करतात तर हे भीक मागण्यात आनंद मानतात
या फिल्म मधून या समाजाच्या व्यथा मांडलेल्या आहेत. या समाजातील तरुणांना शिक्षणाचे महत्व कळू लागले आहे. पण त्यांना पोटासाठी भीक मागावी लागत आहे. तर मग शिक्षणाचा प्रश्न सुटणे अवघडच आहे. पोटासाठी त्यांना अन्नच मिळत नाही तर शिक्षण कसे करणार असाही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे करत असतात. लोक दिवाळी सणाचा आनंदोउत्सव साजरा करत असतात. तर हा समाज दिवाळीचे भीक मागून खाण्यात आनंद मानतो.

भीक मागण्यासाठी गावे वाटून घेतली जातात
भीक मागण्यासाठी या समाजातील लोकांनी गावे वाटून घेतलेली असतात. या गावात या समाजाच्या दुसऱ्या व्यक्तीला भीक मागू दिली जात नाही. तो जर भीक मागण्यास गावात आला तर त्याची ढोलकी फोडून टाकली जाते. भीक मागायची गावे विकता ही येतात. याच समाजातील लोक याची लाखात खरेदी करतात. त्यामुळे या लोकशाही भारतात ही आणखीन ही एक वेगळी पद्धत पहायला मिळते. या समाजात पौर्णिमा आणि आमावस्येला शुभ दिवस मानून लग्ने केली जातात,अशी माहिती रशीदने दिली.
मुंबईला सेन्सॉरच्या कामानिमित्त गेल्यानंतर रशीद राहिला कचराडेपो जवळच्या झोपड्यात

रशीद इरसाल चित्रपटाच्या सेन्सॉरच्या कामानिमित्त मुंबईला गेल्यानंतर तो त्याच्या बांधवांसोबत कचरा डेपोजवळच्या झोपड्यात राहिला होता. त्यांनी मागून आणलेली भीक ही त्याने खाल्ली होती. सध्याही रशीद तेच जीवन जगत आहे. पण शिक्षणाने त्याच्यात स्वाभिमान जागृत झाला आहे.