भीक मागून खाणाऱ्या मुलाच्या चित्रपटाला 'बेस्ट फिल्म जुरी अवार्ड'
X
सोलापूर : व्यवस्थेमुळे पिढ्यानपिढ्या वाट्याला आलेले दारिद्र्य सोसत आई-वडील गावोगावी डोक्यावर मरीआईचा गाडा घेऊन भीक मागून कुटूंबाची गुजराण करतात. जेथे पोट भरण्याची पंचायत तेथे शिक्षण घेणे तर दूरच...राहायला ना घर, ना जागा, ना जमीन, गावाच्या बाहेर जागा मिळेल तेथे उभारायची पालाची झोपडी आणि तेथेच करायचा मुक्काम... हा मुक्काम गावच्या हागणदारी आणि स्मशानभूमीत कायमच असतो. हागणदारी म्हणजे यांची वतनदारी.... ही कहाणी आहे मरीआईवाले समाजाची. जो गेल्या अनेक शतकांपासून उपेक्षित,शोषित, वंचिताचे जीवन जगत आहे.
गावाने दुर्लक्षित केलेल्या जागेत गावोगावी फिरत असताना पालाच्या झोपडीत राहून भीक मागून आपली पोटाची खळगी भरतात. या समाजातील लोकांकडे सोयी सुविधांचा अभाव असतानाही या समाजातील रशीद उस्मान निंबाळकर या युवा दिग्दर्शकाने प्रथमच दिग्दर्शित केलेल्या 'इरगाल' चित्रपटाला नुकताच नवी दिल्लीत पार पडलेल्या 12 व्या दादासाहेब फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट फिल्म जुरी अवार्ड' मिळाला आहे. या चित्रपटाचे प्रोड्युसर गिरीश गवळी असून त्यांनी आणि 'इरगाल' चित्रपटाच्या टीमने पुरस्कार नवी दिल्ली येथे स्वीकारला.
718 फिल्म मधून 'इरगाल' चित्रपटाला 'बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्ड'
दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतातून आणि जगभरातून 718 फिल्म आल्या होत्या. यामध्ये 'जय भीम' चित्रपटाला 'बेस्ट फिल्म अवार्ड' मिळला. तर 'बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्ड' इरगाल चित्रपटाला मिळाला आहे. बेस्ट अँक्टरचा अवॉर्ड 'तुफान' चित्रपटासाठी 'फरहान अख्तर' ला देण्यात आला. तर अमिताभ बच्चन यांनी अभिनय केलेल्या 'चेरी' फिल्म ला 'मेंशन अवार्ड' ने सन्मानित करण्यात आले. रशीद निंबाळकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'इरगाल' चित्रपटाची कथा मरीआईवाले समाजाच्या सत्य परिस्थितीवर आधारीत आहे. त्याने या चित्रपटातून या समाजाच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, त्यांची भीक मागताना होणारी परवड, त्यांना येणाऱ्या विविध अडचणीची मांडणी या केली आहे.
'इरगाल' चित्रपटाची थोडक्यात कथा
भारतीय समाजात आजही काही जाती विकासापासून कोसो दूर आहेत. शासनाच्या विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत आजही पोहचलेल्या नाहीत. सामाजिक विषमतेमुळे दबलेल्या समाजाच्या दुःखाची जाणीव भारतीय समाजाला व्हावी या उद्देशाने 'मरीआईवाले' समाजातील एका युवकाने या समाजाच्या अडचणींवर चित्रपटातून भाष्य केले आहे. त्यांचे दुःख जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. मरीआईवाले समाज सामाजिक विषमतेमुळे वर्षानुवर्षे अंधाराच्या खाईत लोटलेला आहे. तो भीक मागून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहे. सातत्याने या समाजातील लोक पोटासाठी भटकंती करत राहतात. समाजाचे दुःख भारतीय समाजाला समजावे. त्यांचे जीवन किती अडचणीने ओतपोत भरले आहे. जीवन जगण्यासाठी मरीआईवाले समाजाचा दररोजचा चालला संघर्ष सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न या समाजातील उच्च शिक्षित तरुण रशीद उस्मान निंबाळकर या तरुणाने केला आहे. त्याच्या या सिनेमाचे नाव 'इरगाल' असे आहे. या सिनेमाने देशातील तसेच परदेशातील फिल्म फेस्टिवलमध्ये एन्ट्री मारली आहे.
*चित्रपटाची कथा तयार करण्यासाठी आठ वर्षांचा काळ *
रशीद निंबाळकर यांनी सांगितले, की 'इरगाल' ही फिल्म सत्य परिस्थितीवर आधारित आहे. मी जे जीवन लहानपणापासून जगत आलो आहे. ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत. त्याच गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहेत. या समाजाच्या अडचणी काय आहेत. मुले शिक्षण का घेत नाही. जर शाळा शिकले तर त्यांच्यापुढे कोणत्या समस्या येतात. त्यांना अर्ध्यातूनच शाळा का सोडावी लागते. यासह अनेक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. इरगाल चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी गेल्या 8 वर्षांपासून स्टोरी रायटिंग करत होतो. स्टोरी लिहून झाल्यानंतर बऱ्याच चित्रपट निर्मात्यांकडे गेलो, पण त्यासाठी एकही चित्रपट निर्माता तयार झाला नाही. लोकांचा विश्वास बसावा म्हणून छोटीशी शॉर्ट फिल्म बनवायचे ठरवून 'डमरू' नावाची शॉर्ट फिल्म बनवली. या फिल्मला औरंगाबाद, बेंगलोर आणि इतर फिल्म फेस्टिव्हलमध्ये अवॉर्ड मिळाले. महत्वाचे म्हणजे या फिल्मला दिल्ली सरकारने नॅशनल ह्यूमन कमिशन येथे स्पेशल मेन्शन म्हणून पहिला अवार्ड दिला.
इरगाल सिनेमाच्या निर्मितीला अनेकांचा नकार
सिनेमा निर्मात्याकडे कथा घेऊन गेल्यानंतर अनेक चित्रपट निर्मात्यांनी हा सिनेमा बनवायला नकार दिला होता. पण पेनूर गावचे रहिवाशी असलेले गिरीश यशवंत गवळी यांनी या चित्रपटाची कथा ऐकून प्रोड्युसर म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. त्यांनीही नुकतेच प्रोड्युसर म्हणून पदार्पण केले होते. त्यांना समाजाची सत्यपरस्थिती सांगितली. प्रत्येक समाजाचा उल्लेख कोठेतरी येतोच, पण या समाजाचा उल्लेखच येत नाही. त्यामुळे हा सिनेमा बनवायला पाहिजे हे त्यांना पटवून दिले. या मरीआईवाले समाजाच्या व्यथा काय आहेत,याची माहिती इतर समाजाला होणे आवश्यक आहे. या चित्रपटात हा समाज जगत असलेले रिअल जीवन दाखवले आहे."
सुट्टीत वडिलांबरोबर रशीद भीक मागायला जायचा
रशीद निंबाळकर शाळेला सुट्टी असली, की लहानपणी आई-वडिलांबरोबर भीक मागायला जात होता. आईच्या डोक्यावर देवीचा गाडा असायचा तर वडिलांच्या गळ्यात चाबूक असायचा... आई डोक्यावरील देवीचा गाडा गावातील चौकात ठेवून ढोलकी वाजवायची तर वडील हातातील चाबकाने अंगावर फटकारे मारून घेत असत. ढोलकीचा आणि चाबकाच्या फटक्यांचे आवाज ऐकून त्या चौकाच्या आजूबाजूला राहणाऱ्या महिला हातात सूप घेऊन येत असत. सुपात धान्य असायचे, त्या महिला देवीची पूजा करून धान्य झोळीत टाकत. हा समाज सतत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत राहतो. त्यांना भीक मागण्यातच मोठे समाधान वाटते. रशीद आठवी, नववी, दहावीत असताना शाळेला उन्हाळी सुट्टी लागली, की वडीलांबरोबर भीक मागायला जात होता.
जातप्रमाणपत्र नसल्याचे इंजिनिअरिंग सोडावे लागले
या चित्रपटात काम करणाऱ्या दामोदर पवारला कोल्हापूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. पण कास्ट व्हॅलीडीटी नसल्याने त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शासनाच्या योजना या फक्त कागदावरच आहेत. त्या ग्रामीण भागातील समाजापर्यंत पोहोचल्या नाहीत. केवळ कास्ट व्हॅलीडीटी नसल्याने दामोदरला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. हा समाज सतत स्थलांतर करत असल्याने यांच्याकडे जन्म दाखले नाहीत. आणखीही काही जणांकडे आधारकार्ड नाहीत. या समाजातील लोक वर्षातील 2 ते 3 महिनेच गावाकडे येतात. बाकी 8 महिने पोटासाठी भटकत राहतात. या समाजातील लोक ऋतुनुसार स्थलांतर करत राहतात. म्हणजे दिवाळी आली, की मुंबई, कोकणात जातात. उन्हाळा आला,की ज्वारीच्या सिझनला उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात जातात. दुसऱ्या गावात जात असताना मुलांना कोठेही रस्त्यात जन्म देतात. त्यामुळे त्यांच्या जन्माची कोठेच नोंद होत नाही. एवढ्या लांबून गावाकडे तर माघारी येऊ शकत नाहीत. त्यापेक्षा दोन दिवस गावाकडे जाण्यापेक्षा भीक मागून पोटाला अन्न तर मिळेल, असा त्यांचा विचार असतो. त्यामुळे मुलांच्या जन्माची नोंद आढळून येत नाही. याच कारणाने जन्म दाखला निघत नाही.
या फिल्ममधून या समाजाच्या व्यथा मांडलेल्या आहेत. या समाजातील तरुणांना शिक्षणाचे महत्व कळू लागले आहे. पण त्यांना पोटासाठी भीक मागावी लागत आहे, पोटासाठी त्यांना अन्नच मिळत नाही तर शिक्षण कसे करणार असाही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. लोक वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे करत असतात. लोक दिवाळी सणाचा आनंदोउत्सव साजरा करत असतात. तर हा समाज दिवाळीचे भीक मागून खाण्यात आनंद मानतो.
भिकेसाठी गावं वाटून घेतली जातात
भीक मागण्यासाठी या समाजातील लोकांनी गावे वाटून घेतलेली असतात. या गावात या समाजाच्या दुसऱ्या व्यक्तीला भीक मागू दिली जात नाही. तो जर भीक मागण्यास गावात आला तर त्याची ढोलकी फोडून टाकली जाते. भीक मागायची गावे विकताही येतात. याच समाजातील लोक याची लाखात खरेदी करतात. त्यामुळे या लोकशाही भारतात ही आणखीही एक वेगळी पद्धत पहायला मिळते. या समाजात पौर्णिमा आणि अमावस्येला शुभ दिवस मानून लग्ने केली जातात, अशी माहिती रशीदने दिली.
रशीद इरागाल चित्रपटाच्या सेन्सॉरच्या कामानिमित्त मुंबईला गेल्यानंतर तो त्याच्या बांधवांसोबत कचरा डेपोजवळच्या झोपड्यात राहिला होता. त्यांनी मागून आणलेली भीकही त्याने खाल्ली होती. सध्याही रशीद तेच जीवन जगत आहे. पण शिक्षणाने त्याच्यात स्वाभिमान जागृत झाला आहे. पहिल्याच फिल्मला दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट फिल्म ज्युरी अवार्ड' मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.